नाणार प्रकल्प विदर्भात नेल्यास पावसाळी अधिवेशन नागपुरात- उद्धव ठाकरे

0
11

मुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.25: जर मुख्यमंत्री नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प विदर्भात आणण्याची घोषणा करणार असतील तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार आशीष देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘आशीष देशमुख यांनी अभ्यासपूर्ण प्रस्ताव दिला आहे. मला त्यांचे कौतुक वाटते. नाणार राहणार नाही जाणार हे आता नक्की झाले आहे. प्रकल्प गुजरातला जाण्याची भीती दाखवली जात होती. हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प नेला जावा. मुख्यमंत्र्यांनी वारंवार गुजरातची भीती दाखवू नये,’ असे ठाकरे म्हणाले. ‘या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भाला त्याची गरज आहे,’ असेही ठाकरेंनी म्हटले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्णयाचंही कौतुल केले. ‘देसाई यांनी घेतलेला निर्णय अभ्यासपूर्ण होता. कायदे जनतेसाठी आहेत. जनता कायद्यासाठी नाही आणि आम्ही जनतेसोबत आहोत,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रकल्प कोकणात होणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.