माओवाद्यांचा मोर्चा गोंदियाच्या रेस्टझोन कडे

0
22
नागनडोह जंगल परिसरात पोलीस – नक्षल चकमक
 गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.27 :मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा  रेस्ट झोन म्हणून माओवादी वापर करीत होते. मात्र गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून या भागात माओवादी हालचाली वाढल्या आहेत. भरनोली, मुरकुटडोह येथे स्फोटके सापडल्यानंतर आता सोनपुरीत पत्रके आढळली आहेत.त्यानंतर सालेकसा तालुक्यात चकमकीही घडल्या तर गेल्या महिन्यातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी भरनोली भागात माओवाद्यानी पेरून ठेवलेले भुसुरंग निकामी करण्यात पोलिसांना यश आले होते.मात्र  २५ एप्रिल पुन्हा केशोरी पोलीस ठाणेंतर्गत नागनडोह परिसरात सकाळच्या सुमारास माओवादी व पोलीसामध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलीसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत ८ ते १० च्या संख्येत माओवादी जखमी झाले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.याप्रकरणात केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागनडोह जंगलात बुधवारी पोलीस व नक्षल चकमकी संदर्भात १५ नक्षलवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये जगदीश टेकाम, राजा मडावी, बलराज, राकेश, सुखदेव, रामदास हलामी, आझाद, स्वरुपा, वंदना, शिल्पा, महेश, विजू व इतर तीन अशा १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बिरीयाच्या घटनेनंतर माओवादी हे गोंदियाकडे आपला मोर्चा वळवून रेस्टझोन मध्ये येण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीसांनी लागली.त्यानुसार नवेगावाबांध सी.६० चे पथक नागनडोह जंगल परिसरात सर्चिंगला निघाले होते.जंगल परिसरात शिरताच पोलीस व माओवाद्यामध्ये चकमक झाली.माओवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे सिद्ध झाले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच गोंदिया जिल्ह्यात सी-६० तैनात करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे सध्या माओवाद्यांना जेरीस जे जवान आणत ते पुर्णतःयुवाशक्ती आहे.त्यामध्ये उच्चशिक्षितांचाही समावेश आहे.एकेकाळी माओवाद्यांमध्येच वकील,डाॅक्टर असायचे परंतु आता सी 60 चे पथक असो पोलीस यांच्यातही हे युवक येऊ लागल्याने त्यांचा जोश माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी महत्वपुर्ण ठरत आहे.
गेल्या काही दशकांपासून पूर्व विदर्भात माओवादी चळवळ चांगलीच फोफावली आहे.माओवादीच्या वाढत्या घातपाती कारवायांमुळे पोलिसांसह आदिवासीबांधवांनाही जीव गमवावा लागला. यावर उपाय म्हणून या भागातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयोग राबविण्यात येत आहेत. जनजागरण मेळावे हा त्यातलाच एक उपक्रम. पण, त्यातून आजपर्यंत काय साध्य झाले हा संशोधनाचा विषय ठरेल. नेमकी हीच बाब हेरून मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश, छत्तीसगड भागात घातपाती कारवाया केल्यानंतर माओवादी गोंदियाच्या जंगलात येऊन विश्रांती घेतात. गोंदिया हा रेस्ट झोन म्हणूनच माओवादीमध्ये प्रसिद्ध आहे. याची कबुली दस्तरखुद्द पोलिस अधिकारीच देतात.
गोंदिया जिल्हा माओवादी चळवळीचे केंद्र ठरले आहे. या भागात अनेक नक्षली नेत्यांना अटक करण्यात आले आहे. यात परेरा, मुरली यासारख्यांचा समावेश आहे. या कारवायांचा धसका घेतमाओवादीनी आपले बस्तान इतरत्र हलविले होते. परंतु, काही दिवसांच्या विश्रातीनंतर आता ते हळूहळू पुन्हा पाय पसरू लागले आहेत.
तत्कालीन भंडारा आणि आत्ताच्या गोंदिया जिल्ह्यात १९८९ च्या दशकापासून नक्षल चळवळीने आपले पाय रोवले. या पहिल्याच वर्षी नक्षल्यांविरोधात १२ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यामध्ये हत्या, चोरी, दरोडे यासारख्या घटनांचा समावेश आहे. १९९१ मध्ये पहिली पोलिस – नक्षल चकमक झाली. त्यानंतर अनेकदा रक्तपात घडविण्यात आला. १९९३ नंतर नक्षल कारवाया वाढल्या. १९८९ मध्ये १२ गुन्हे नक्षल्यांविरोधात दाखल करण्यात आले. त्यात दोन घटना जाळपोळीच्या होत्या. १९९१ मध्ये पोलिस आणि नक्षल्यात दोन चकमकी झाल्या. त्यानंतर १९९२ मध्ये दोन, १९९३ मध्ये सात चकमकी, १९९४ मध्ये दोन, १९९५ मध्ये चार, १९९६ मध्ये दोन, १९९७ मध्ये तीन, १९९८ मध्ये एक, २००१ मध्ये एक, २००२ मध्ये तीन, २००३ मध्ये पाच, २००६ मध्ये तीन, २००७ मध्ये तीन, २००८ मध्ये एक, २००९मध्ये दोन, २०११ मध्ये दोन आणि २०१२ मध्ये आत्तापर्यंत एक अशा ४४ चकमकी झाल्या.त्यानंतर २०१८ पर्यंत किमान पाच ते सहा चकमकी झाल्या असून ५० वर चकमकी माओवादी व पोलिसात झालेल्या आहेत.
नागझिरा व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे जंगल तसेच सीमावर्ती भागातील टेकड्यांचा आसरा घेत नक्षल्यांनी घातपाती कारावाया सुरू केल्या. नक्षल कारावायांत आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यातील २० पोलिसांना जीव गमवावा लागला. याबरोबरच पोलिस पाटलासंह पोलिसांचा खब?्या म्हणूनही अनेकांची माओवादीनी हत्या केल्या आहेत. सालेकसा, देवरी, मोरगाव-अर्जुनी या तालुक्यातील घनदाट जंगलामध्ये तात्पुरता मुक्काम करण्यासाठी माओवादी थांबतात. हे तीन तालुके मोठ्या प्रमाणावर नक्षल प्रभावित आहेत. पोलिस प्रशासनाच्या मते गेल्या काही दिवसांपासून या भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली व त्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. माओवाद्यांच्या हालचालीवर नियंत्रण आणण्यासाठी सशस्त्र पोलिसांसाठी चौक्याही उभारण्यात आल्या आहेत.या परिसरात नक्षल्यांचे देवरी दलम आणि कोरची दलम कार्यरत आहेत. जिल्ह्याचा विचार करता देवरी, दरेकसा, स्पेशल गुरील्ला स्कॉड, तांडा, कुरखेडा हे पाच दलम सक्रिय असल्याचे दिसून येतात.