यशच्या आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या

0
9

नागपूर,दि.7 : दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला फाशीचीच शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकार पक्षाने सोमवारी सत्र न्यायालयाला केली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांच्यासमक्ष खटल्यावर सुनावणी पूर्ण झाली असून त्यांनी आरोपी काळवेला खंडणीसाठी अपहरण (भादंवि कलम ३६४-अ), खून (भादंवि कलम ३०२) व पुरावे नष्ट करणे (भादंवि कलम २०१) या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. सोमवारी सरकार व बचाव पक्षाने आरोपीच्या शिक्षेवर युक्तिवाद केला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली. आरोपी काळवे यशच्या ओळखीचा होता. काळवेने याचा फायदा घेऊन खंडणी वसुलीसाठी यशचे अपहरण केले व त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून केला. वैद्यकीय तपासणीत यशच्या शरीरावर २२ जखमा आढळून आल्या होत्या. यश आरोपीपुढे असहाय होता. तसेच, आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. हे प्रकरण दुर्मीळ प्रकारात मोडते. त्यामुळे आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी कोल्हे यांनी केली. बचाव पक्षाचे वकील संतोष चांडे यांनी आरोपी तरुण असल्याने व तो सुधारण्याची शक्यता लक्षात घेता त्याला फाशीची शिक्षा देणे योग्य होणार नाही असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिक्षेवरील निर्णय बुधवारपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे आरोपीला कोणती शिक्षा होते हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.ही घटना ११ जून २०१३ रोजी घडली होती.