काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी देणे चुकीचे; खडसे

0
10

मुंबई,दि.14(विशेष प्रतिनिधी)- भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूमुळे पालघरमध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. हे साफ चुकीचे असल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन चूक केली असे भाजप म्हणते, मग तुम्ही राजेंद्र गावितांना उमेदवारी कशी दिली? असा सवालही खडसेंनी केला आहे.

पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिलेला प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला आहे. या निवडणुकीतून माघार न घेण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, त्यांचे आम्ही पुनर्वसन करु. श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला होता. परंतु शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला आहे.भाजप आणि शिवसेनेने परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने पालघरमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.