भाजपचा संविधानविरोधी अजेंडा यशस्वी होऊ देणार नाही

0
9

भंडारा,दि.15 : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार संविधानविरोधी असल्याचे चित्र आता समोर येत आहे. २०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलविण्याचा भाजपचा अजेंडा आहे. मात्र भाजपाचे हे प्रयत्न कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा ईशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, राज्यातील सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर टिकून आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली असती तर जार्इंट किलर ठरले असते. मात्र काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडली. राष्ट्रवादीने कमकुवत उमेदवार देऊन भाजपचा पर्यायाने नरेंद्र मोदी यांचा विजय सोपा केला आहे.
नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार असते आम्ही आपला उमेदवार रिंगणात नसता. आता भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने पटोलेंचा राजकीय गेम करीत आहे. आपला पक्ष राष्ट्रवादीला कधीही पाठिंबा देणार नाही. येत्या निवडणुकीत आपण कुणासोबत या प्रश्नावर ते म्हणाले, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नसली तरच आपण पाठिंबा देऊ, असेही स्पष्ट केले. सर्वच राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष संपले पाहिजे, असे वाटत असते. परंतु आज वेगळी परिस्थिती आहे. राष्ट्रीय पक्षावर लोकांचा भरवसा राहिलेला नाही. या पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराची भाजपशी लढत राहील, असेही त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधींच्या काळात अघोषित आणीबाणी होती. मोदी सरकारने घोषित करून आणीबाणीची परिस्थिती आणली आहे. आता संघटित मतदार हा भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या २० मे रोजी पंढरपूर येथे होणाºया धनगर समाजाच्या संमेलनातून वेगळ्या समिकरणाची नांदी दिसून येईल, असे स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भारिपचे उमेदवार अ‍ॅड. लटारी मडावी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय उपस्थित होते.