चंद्रपूर जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांनी गाठले एव्हरेस्ट

0
9

चंद्रपूर,दि.17ः-मिशन शौर्य या धाडसी उपक्रमांतर्गत अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने तसेच प्रोत्साहनाने चंद्रपूर जिल्ह्य़ातील आदिवासी आर्शमशाळांमधील १0 आदिवासी विद्यार्थी महिन्याभरापूर्वी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करण्यासाठी निघाले होते. यातील चार विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गाठले.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील शासकीय आदिवासी आर्शमशाळा देवाडा येथील उमाकांत सुरेश मडावी, प्रमेश सीताराम आले, मनीषा धर्मा धुर्वे आणि शासकीय आदिवासी आर्शमशाळा जिवती येथील कवीदास पांडुरंग काटमोडे या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्य़ाची मान अभिमानाने उंच केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने नुकतीच चंद्रपूर आणि बल्लारपूर ही रेल्वे स्थानके देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानके म्हणून विजेती ठरली. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्य़ातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी हा पराक्रम करून चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
मिशन शौर्य हा उपक्रम अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून या विद्यार्थ्यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी चंद्रपुरात आयोजित कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या. या १0 विद्यार्थ्यांपैकी आणखी २ विद्यार्थी येत्या २ दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील. या धाडसी, शूर, देशभक्त विद्यार्थ्यांचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.