प्रेरकांना नियमित करा,आ.अग्रवालांना निवेदन

0
25

गोंदिया,दि.21 : साक्षर भारत योजनेंतर्गत गावांत कार्यरत प्रेरकांना सेवेत नियमित करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साक्षर प्रेरक-प्रेरिका संघाच्यावतीने आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी प्रेरकांच्या मागण्या शासनापुढे मांडून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.
साक्षर भारत योजनेंतर्गत प्रत्येक गावात दोन प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावातील नागरिकांना शिक्षण देऊन साक्षर बनविण्यासाठी दोन हजार रूपये दरमहा मानधनावर त्यांनी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र भारतीय जनता पक्षाची सरकार आली तेव्हापासून या प्ररेकांना मानधन देण्यात आलेले नाही. यामुळे प्रेरकांच्या राज्यस्तरीय संघटनेने १६ जुलै रोजी विधानसभेवर मोर्चाही नेला होता.
दरम्यान, प्रेरकांचा मागील तीन वर्षांचे थकीत मानधन देण्यात यावे, प्रेरकांना सेवेत नियमित करावे, सरळसेवा भरतीत प्रेरकांना प्राधान्य द्यावे, त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी आदि मागण्यांचे निवेदन प्रेरक संघाच्यावतीने आमदार अग्रवाल यांना देण्यात आले. आमदार अग्रवाल यांनी प्रेरकांच्या मागण्या शासनापुढे मांडणार असल्याचे आश्वासन संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देताना संघाचे जिल्हाध्यक्ष सुजीत गेडाम, मिथुन बांबोळे, भुजंग अर्जुने, भाऊसाहेब राठोड, फिरोज पठाण, अविनाश जाधव, माणिक कांबळे, रामकृष्ण बचाटे, रूपेश पतंगे, स्वामीराज भोरे उपस्थित होते.