घोषणाबाजीचा आढावा घ्या, अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
12

मुंबई,दि.08 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महाअधिवेशनाच्या विचारमंचावरून केलेल्या घोषणांची चिरफाड करीत मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा करत असतात. परंतु, आपल्याच घोषणांची आपण अंमलबजावणी करतो का? याचा वर्षातून एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टोला हाणला.

वरळी येथील एनएससीए सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या महाअधिवेशनात चव्हाण  बोलत होते. महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी फडणवीस  यांनी ओबीसींच्या नोकरीतील अनुषेश भरुन काढण्यासोबतच विविध घोषणा केल्या होता. याचा संदर्भ घेऊन चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या घोषणांचाच एकदा आढावा घ्यावा. तसेच महाअधिवेशनाच्या आयोजकांनाही माझी एक विनंती आहे. आज या विचारमंचावरुन ज्या काही घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली की नाही याचा आढावा त्यांनी पुढच्या अधिवेशनात घ्यावा. समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे, सरकारने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावू नयेत, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,माजी मंत्री माणिकराव ठाकरे,अध्यक्ष बबनराव तायवाडे,राजकीय समन्वयक डाॅ.खुशाल बोपचे,कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जिवतोडे,खासदार मधुकर कुकडे, आमदार विजय वड्डेटीवार आदी मंचावर उपस्थित होते.