‘अटल’ नेता हरपला : वाजपेयींचे 93 व्या वर्षी निधन

0
14

नवी दिल्ली,दि.16ः-   बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ
पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ
निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा…
या आपल्या कवितेप्रमाणेच, प्रत्येक संकटाशी न डगमगता लढलेले, सत्तेचा मोह न बाळगता हसत-हसत राजीनामा देण्याचं धारिष्ट्य दाखवलेले आणि एक-दोन नव्हे तर तब्बल 22 पक्षांसोबत ‘कदम मिलाकर’ सरकार चालवलेले देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली. ते 93 वर्षांचे होते. वाजपेयी हे 11 जूनपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. पण बुधवारी सायंकाळपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. बुधवारी रात्रीच्या मेडिकल बुलेटिनमध्ये वाजपेयींची प्रकृती चिंताजनक असून त्यांनी लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळच्या मेडिकल बुलेटिनमध्येही अटलजींच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसून चिंताजनक असल्याचेच सांगण्यात आले. अखेर गुरुवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तीन वेळा भारताचे पंतप्रधान 
> 25 डिसेंबर 1924 मध्‍ये ग्‍वाल्‍हेरमध्ये जन्म. ग्‍वाल्‍हेरच्‍या व्‍हिक्‍टोरिया कॉलेजमध्‍ये शिक्षण झाले.
> राज्‍यशास्‍त्रात पीजी केले आणि पत्रकारितेतून करियरला सुरुवात.
> 1951 मध्‍ये वाजपेयी भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य होते. 1957 मध्‍ये जनसंघाने निवडणूक लढवली. पुढे नऊ वेळा ते लोकसभेवर निवडून गेले.
> 1977 मध्‍ये ते जनता पार्टीच्‍या सरकारमध्‍ये परराष्ट्र मंत्री होते.
> 1980 ते 1986 पर्यंत ते भाजपाचे अध्‍यक्ष राहिले.
> अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषविले आहे. ते पहिल्यांदा फक्त 13 दिवसांचे पंतप्रधान बनले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले. यानंतर ते 1998 ते 1999 पर्यंत 13 महिन्यांचे पंतप्रधान बनले होते. मग, यानंतर ते पुन्हा 5 वर्षांपर्यंत देशाचे पंतप्रधान राहिले होते.

पंतप्रधान म्हणाले मी शून्यात गेलो..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने मी शून्यात गेलो असल्याचे, पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले..मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है।