संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांना त्वरित अटक करा

0
8

गोंदिया दि.२८ः: दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकत्यांनी देशाच्या संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या प्रकारामुळे सर्व समाजबांधवामध्ये रोष व्याप्त आहे. संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी युवा मुस्लीम अल्पसंख्याक विचार मंचातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भारतीय संविधान देशात नव्हे तर जगात सर्वश्रेष्ठ आहे. याच संविधानाच्या आधारावर देश चालतो. मात्र काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रती जाळून देशद्रोहाचे कार्य केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन त्यांचा अपमान केला आहे. या सर्व प्रकारामुळे समाजबांधवामध्ये संताप व्याप्त आहे. त्यामुळे असे देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करुन अटक करण्याची मागणी युवा मुस्लीम अल्पसंख्याक मंचाने केली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात जुनेद शेख, गुड्डू हुसैनी, सैयद जाकीर अली, लतीफ खान, मुजीब खान, यामिन शेख आदींचा समावेश होता.