बुद्धिमत्तापेक्षा प्रयत्नांची चिकाटी महत्वाची – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

0
16

# शंकर नारायण महाविद्यालयात प्रतिपादन

मुंबई /  भाईंदर. ( प्रतिनिधी ),दि.03 – कोणाची बुद्धिमत्ता किती यापेक्षा प्रयत्न महत्वाचे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सह संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी शंकर नारायण महाविद्यालयातील रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात नुकतेच केले.
यावेळी डॉ. लहाने म्हणाले की, प्रयत्नांची चिकाटी, प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा, आई वडिलांचा आदर अशा नानाविध मूल्यांचा उल्लेख करत अभ्यास करताना कोणत्या पद्धती वापराव्यात. मुद्दे लक्षात राहण्यासाठी कोणत्या रंगाच्या पेनाने त्या अधोरेखित कराव्यात. अशा छोट्या-छोट्या मुद्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. मोबाईलचा अतिवापर, जंकफूड आदी तरुणाईच्या वीक पाईंट वर सुद्धा त्यांनी बोट ठेवला. आतापर्यंत एक लाख एकसष्ठ हजार ऑपरेशन न थकता, न सुट्टी घेता केली. बरा झाल्यावर पेशंटच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हाच खरा ठेवा असतो. दुसऱ्यांसाठी काहीतरी निरपेक्ष काम करा तेच तुम्हाला जीवतात यशस्वी बनवील, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या संघर्षमय आयुष्याचे किस्से ऐकवताना त्यांनी प्रामाणिक पणा आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. लहाने पूर्वी जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता होते. रक्तदान कार्यक्रमाच्या माध्यमातून या दोन्ही महाविद्यालयांचे 17 वर्षांचे दृढ संबंध आहेत. रक्तदानात सर्वात मोठे योगदान दिल्याबद्दल आताच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकाऱ्यांचा गौरव सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला आहे. याची दाखल घेत डॉ. लहाने यांनी महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.आपल्या नेहमीच्या शैलीत डॉ. लहानेंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील उद्गार काढले. आपल्या विविधरंगी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाशी, जीवनाशी संबंधीत टिप्स दिल्या. दरम्यान शंकर नारायण महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केल्या जात असलेल्या विविध कार्यक्रमात डॉ. तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानाने भर पडली.
संस्थेचे अध्यक्ष तथा मिरा भाईंदर मनपा सभागृह नेता रोहिदास पाटील म्हणाले की, आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेल्या मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी जडणघडणीच्या वयात विद्यार्थ्यांना मिळावी, तसेच महाविद्यालयाच्या 25 व्या वर्षा निमित्ताने अधिकाधिक नामवंतांचे आगमन व्हावे, त्यांच्या शुभेच्छा मिळाव्या असा हेतू कार्यक्रमाचा असल्याचे पाटील म्हणाले. या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा तुडुंब प्रतिसाद होता. डॉक्टरांच्या भाषणाने प्रेरित झाल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली. आठांवणीत जपून ठेवावे असे हे व्याख्यान होते, असे मत माजी विद्यार्थी प्रतिनिधी शाहरुख मुलाणी यांनी दिली. प्रा. निमेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा मिरा भाईंदर मनपा सभागृह नेता रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे, प्राचार्य डॉ. विष्णु यादव आणि सर्व प्राध्यापक वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होता.