शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसंदर्भात घेतलेल्या निर्णयानुसारच आम्ही यापुढे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचेही कीर्तीकर म्हणाले. पूर्व विदर्भातील सर्व ६ जागांवर लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना सत्तेने बेधुंद केले असून भाजप त्यांच्या मित्र पक्षांना चुकीची वागणूक देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अनेक पक्ष भाजपपासून दूर गेले आहेत.पंतप्रधान संसदेत खासदारांचा सन्मान करत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना नमस्कार करणे बंद केल्याचेही ते म्हणाले. राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र रंगणार असून भाजपचा गड समजला जात असलेल्या विदर्भात शिवसेना आपले प्रस्थ वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. विदर्भातील वर्धा,चंद्रपूर,भंडारा-गोंदिया व नागपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची स्थिती चांगली असून या जागा जिंकण्याच्या परिस्थितीत असल्याचे सांगत 15-20 आमदारही पुढच्या निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
किर्तीकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुकीतही भाजपाची लाट होती. मात्र आता लाट संपली आहे. नोटाबंदी देशासाठी घातक ठरली. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. अनके छोटया व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू आहे. काही वर्षापूर्वी भाजपाकडे पैसा नव्हता, परंतु आता ज्या- ज्या ठिकाणी निवडणुका होतात. तेथे भाजपाकडून पैशाचा वापर केला जातो. असे असले तरी विदर्भामध्ये शिवसेनेला मजबूत पाठिंबा आहे. पक्ष बळकट करण्यासाठी बूथस्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी काम करण्यात येत आहे.सोबतच आम्ही वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या विरोधात आजही कायम असल्याचे स्पष्ट केले.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्वच विधानसभा लढविण्यात येणार असून पक्षासाठी सातत्याने काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही किर्तीकर यांनी सांगितले.