नांदेड दि. 17 – कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना महाबीजच्या अनुदानित हरबरा बियाणाचे प्रती शेतकरी सातबारा उताऱ्यावर 1 बॅग वाटप सुरू आहे. बियाणे वाटपामध्ये वाढ करून ती 5 बॅग करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना ते बियाणे पेरणीसाठी पुरेसे ठरेल, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य तथा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यामार्फत केली आहे.
सध्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरणीसाठी हरबरा बियाणाची गरज आहे. खुल्या बाजारात बियाणाची विक्री ही प्रतिकिलो 68 रुपये दराने चालू आहे. कृषी विभागाकडून अनुदानित दराने अन्नसुरक्षा योजनेत 43 रुपये तर ग्राम बिजोत्पादन योजनेत 38 रुपये दराने शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करता येऊ शकते. कृषी विभागाच्या वतीने हरभरा बियाणेमध्ये भरीव अनुदान जाहीर केल्यावर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली, मात्र विक्रेते एका सातबारावर एकच बॅग देत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण होत आहे. इतके बियाणे मात्र एका एकरमध्ये पुरत नाही. एकरी तीस किलो बियाणे पेरणीसाठी लागत आहे, त्यामुळे यात वाढ करून प्रति शेतकरी 5 बॅग हरबरा बियाणांच्या द्याव्यात, महाबीज व इतर हरबरा बियाणे उत्पादक कंपनी यांचं किती अनुदानित बियाणे कोणत्या विक्रेत्याकडून विक्री होणार याची माहिती शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून द्यावी, अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.
या निवेदनावर राज्य सचिव प्रा.विवेक सुकणे, संघटक चक्रधर पाटील, शंकर पवार, रवी ढगे, संदीप पावडे, ज्ञानेश्वर चौधरी, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद अध्यक्ष संगम लांडगे, जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार, रामदास माळेगावे, गजानन कदम, अविनाश पाटील वाघमारे, एकनाथ मोरे, परमेश्वर काळे, मोतीराम पवार, सदा पाटील, दीपक पवार, सुनील पाटील, श्रीकांत पाटील शिंदे, संदीप वानखेडे, दिनेश जाधव, शिवशंकर थोटे, सतीश चव्हाण, विलासराव माने, दिनेश सूर्यवंशी, शेख रहीम, अविनाश कदम, अविनाश ताकतोडे, मंगेश गवळी, शिवराज पवार, गंगाधर पवार, बालाजी पाटील, नामदेव नरवाडे, गायकवाड, देवीदास पवार आदींच्या सह्या आहेत.