नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवानासह चौघे ठार

0
8

रायपूर,दि.09(विशेष प्रतिनिधी)ः-छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच नक्षलवाद्यांनी गुरुवारी(दि.8) मोठा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात आयईडी स्फोट घडवून सीआयएसएफची बस उडवून दिली. त्यात एक जवान शहीद झाला असून तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सात जवान जखमी झाले असून त्यापैकी तीन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात गेल्या सात दिवसात केलेला हा दुसरा हल्ला असून या हल्ल्यामुळे छत्तीसगड हादरून गेले आहे.
दंतेवाडाच्या बचेली येथे हा हल्ला झाला. सीआयएसएफचे एक पथक मिनी बसमधून आकाश नगरकडे जात होते. हे पथक नियमित गस्तीवर होते. मात्र येताना सहकार्‍यांसाठी त्यांना बाजारातून भाजीपालाही आणायचा होता. आकाश नगरच्या मोड नंबर ६ वरून बस वळण घेत असतानाच नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला. त्यामुळे ही बस ८ फूट उंच उडाली. ही बस पुन्हा जमिनीवर आदळताच नक्षल्यांनी जवानांवर प्रचंड गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी सुमारे १५ मिनिटे गोळीबार केला आणि घोषणाबाजी करतच तिथून निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शुक्रवारी छत्तीसगडच्या जगदलपूर येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. दंतेवाड्यापासून जवळ असलेल्या बस्तर विधानसभा मतदारसंघात जगदलपूर आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. १२ नोव्हेंबरला पहिल्या तर १८ नोव्हेंबरसाठी दुसर्‍या टप्प्यासाठी हे मतदान होणार आहे.
गेल्या दहा दिवसातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात १२ नोव्हेंबरला मतदान होत आहे. याच्या तीन दिवसांपुर्वी नक्षल्यांनी जवानांवर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.नक्षल्यांनी लोकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन आधीच केलेले आहे. मतदानासाठी लोकांनी बाहेर निघू नये तसेच निवडणुकीत अडचण आणण्यासाठी नक्षल्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यापुर्वी ३0 आँक्टोबरला दंतेवाडा तर ३१ आँक्टोबरला बीजापूरमध्ये नक्षल हल्ला झाला होता.