धनादेश वटविणारी दांडेगावची सरपंच अपात्र प्रकरण फक्त १२५० रुपयांचे

0
18

गोंदिया दि.५.: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरपंच व उपसरपंचाच्या झोबा-झोंबीने चर्चेत आलेली तालुक्यातील दांडेगाव ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. धनादेश स्वत:च्या नावाने वटविल्या प्रकरणी सरपंच बेबीनंदा विनोद चौरे यांना अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ग) अन्वये दोषी धरत त्यांना अपात्र केले आहे. हा निर्णय अप्पल जिल्हाधिकार्‍यांनी २८ डिसेंबर २०१८ रोजी काढला आहे. या निर्णयाने गावातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
ग्रामपंचायत दांडेगाव येथे २० नोव्हेंबर २०१७ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लागणार्‍या बैठक व्यवस्थेकरिता दरी, खुर्ची आदी मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान गैर अर्जदार सरपंच यांनी बैंक ऑफ इंडिया शाखा एकोडी येथून खाते क्र. ५५०११०१०००१४७ येथून धनादेश क्र. ४९८० अन्वये ६ जानेवारी २०१८ रोजी १२५० रुपयाचे धनादेश स्वत:च्या नावाने वटविले. एकंदरीत स्वत:च्या नावाने पैसे वटविणे हे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ग) चे उल्लंघन असून त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार भाऊदास चिंतामन चौहान यांनी अप्पर जिल्हाधिकार्‍याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत या प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी सुनावनी सुरू केली. दरम्यान गैर अर्जदार यांनी ६ सप्टेंबर २०१८ रोजी लेखी उत्तर सादर केले. तसेच आपली तक्रार खोटी असल्याची माहिती न्नदेत बैठक व्यवस्थेसाठी गायधने बंधु बिछायत केंद्र गंगाझरी यांना १२५० रुपये दिल्याचे म्हटले. परंतु अधिनियमानुसार ग्रामपंचायतच्या जबाबदार पदाधिकार्‍याला स्वत:च्या नावाने धनादेश काढता किंवा वटविता येत नाही. असे असतांनाही त्यांनी तो धनादेश वटविला. यात त्यांचे आर्थिक हित संबंध दिसून येत असल्याचे अर्जदाराच्या वकीलांनी अप्पर जिल्हाधिकार्‍याच्या लक्षात आणून दिले. दोन्ही पक्षाच्या म्हणणे ऐकुण या प्रकरणात गैरअर्जदार सरपंच बेबीनंदा विनोद चौरे यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ग) चे उल्लंघन केल्याचे अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या निदर्शनास आले व त्यांना पदावर कार्यरत राहण्यास अपात्र ठरविण्यात येत असल्याचे आदेश २८ डिसेंबर २०१८ रोजी काढले. एकंदरीत स्वत:च्या नावाने व तेही फक्त १२५० रुपयाचे धनादेश वटविणे सरपंचाला खुपच महाग पडले आहे. निर्णयाविरोधात त्या उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. असे असले तरी नववर्षाच्या पहिल्याच दिवशीच सरपंच बेबीनंद चौरे व उपसरपंच हिरामन बावणकर यांच्यात झोबा-झोंबी होती. या प्रकाराने ग्राम पंचायती मधील वाद चव्हाट्यावर आला होता. दोन्ही पक्षाकडून पोलिसांत तक्रारही झाली. त्यातच सरपंच चौरे यांनी अनुसूचित जाती जमाती तसेच विनयभंगाची खोटी तक्रार केल्याची माहितीही बावणकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचाची थेट निवडणूक झाली होती. सरपंच बेबीनंदा चौरे या ही थेट निवडणुकीतून निवडून आल्या होत्या. जिल्ह्यात थेट निवडून आलेल्या सरपंचामधून सरपंचाला अपात्र होण्याची दुसरी घटना असून यापूर्वी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील सरपंचावर अपात्र होण्याची वेळ आली होती.