महाराष्ट्रातील पाच जणांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

0
9

नवी दिल्ली, दि. 25 : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील 48 व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2018’ आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्लीचे डॉ. चरणजितसिंह सलुजा आणि अमोल लोहार यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार धैर्यशिल आडके यास जाहीर झाला आहे.

देशातील 48 नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील 8 व्यक्तिंना मरणोत्तर ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहेत. ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 15 जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’25 जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.