यवतमाळ(विशेष प्रतिनिधी)दि.16ः- देशाला मी पुन्हा विश्वास देतो की धैर्य ठेवा. पुलवामातील गुन्हेगारांना शिक्षा कधी, कुठे आणि केव्हा देणार हे आपले लष्कर ठरवेल. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना नमन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. तसेच शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जणार नाही असे आश्वस्त केले. सोबतच, या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांना खुली सूट देण्यात आली आहे असेही मोदींनी ठणकावले.यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे जनसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना रोखठोक इशारा दिला आहे. ”पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांची जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. तुम्ही धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असा इशाराच मोदी यांनी दिला.