आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा- हृषीकेश मोडक

0
11
  • सर्व शासकीय विभाग प्रमुख, नोडल अधिकारी यांची बैठक
  • शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश
  • निवडणूक कामात हलगर्जीपणा नको

वाशिम, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व शासकीय विभाग व निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखा अधिकारी युसुफ शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख व निवडणूक विषयक नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदान. ११ एप्रिल २०१९ रोजी होत आहे. तसेच अकोला मतदारसंघातील मतदान १८ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची कार्यवाही सर्व नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयाला सादर करावा.

आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कृती कोणत्याही शासकीय विभागाकडून होता कामा नये. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास संबंधित शासकीय विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच प्रसारमाध्यमे प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आवश्यक नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून सर्व समित्या आणि नोडल अधिकारी यांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवावेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिल्या.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.