भूलथापा देणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा

0
22

तुमसर,दि.10 : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार संसदेत खासदार शपथ घेताना घटनेशी एकनिष्ठ राहून धर्म, जात, पंथ हा भेद न करता प्रत्येकाला न्यायाची हमी देणे, भयमुक्त वातावरणाची निर्मिती करण्याची शपथ घेतो. या शपथेला विद्यमान पंतप्रधानांनी हरताळ फासला आहे. कुटुंबाबद्दल वैयक्तीक टीका करणे, संविधानिक संस्था संपविण्याचा डाव आखण्यात येत आहे. जीवनात मोदीसारखा पंतप्रधान मी बघितला नाही. दिलेली आश्वासने न पाळता केवळ भुलथापा देणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत खासदार शरद पवार यांनी केले.

तुमसर येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मधुकर कुकडे, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार राजेंद्र जैन, आनंदराव वंजारी, अनिल बावनकर, प्रमोद तितीरमारे, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, अभिषेक कारेमोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, सीमा भुरे, माधवराव बांते, कल्याणी भुरे, रेखा ठाकरे, ज्वाला धोटे, राजेश देशमुख, योगेश सिंगनजुडे, डॉ.पंकज कारेमोरे, देवचंद ठाकरे, वासू बांते, ठाकचंद मुंगुसमारे, प्रफुल्ल बिसेन, शुभम गभणे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहेत. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. मी मुख्यमंत्री असताना एका शेतकºयाने आत्महत्या केली होती. तेव्हा भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना गळफास लावण्याची मागणी केली होती. आता दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर भाजपच्या मुख्यमंत्र्याचे काय करावे असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. अनिल अंबानी यांना राफेल विमान तयार करण्याचे कंत्राट दिले. ज्यांना कागदाचे विमान तयार करता येत नाही, त्यांना राफेलचे कंत्राट कसे दिले, असा सवाल केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर केलेल्या सैन्य कारवाईचे श्रेय पंतप्रधान मोदींनी घेतले. फ्लाईट लेफ्टनंट अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. परंतु चार वर्षापासून कुलभूषण जाधव यांची सुटका ५६ इंचाच्या छाती असलेल्या पंतप्रधानांनी का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. संचालन विजय डेकाटे यांनी तर आभार अ‍ॅड. शिशिर वंजारी यांनी केले.
विकासासाठी कटीबद्ध- प्रफुल्ल पटेल
मी सध्या राज्यसभेचा खासदार आहे. पुन्हा तीन वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असल्याने लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ माझी कर्मभूमी आहे. येथील विकासाकरिता मी कटीबद्ध आहे. येथील जनता माझ्यावर खूप प्रेम करते. परंतु माझ्या निवडणुकीत ते मतपेटीतून दिसले नाही. विकासासाठी आपण पूर्ण शक्ती लावण्याची ग्वाही पटेल यांनी दिली. यावेळी राकाँ-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनीही मार्गदर्शन केले.