मतदाराने फोडले मतदान यंत्र;दुपारी 1 पर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान

0
22

मुंबई दि 18(विशेष प्रतिनिधी) – आज सकाळपासून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील 13 राज्यांत 97 जागांवर हे मतदान होत आहे. आज अनेक दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होत आहे. राज्यातील 10 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत असून अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 34 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

अकोला – बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडले. मतदान यंत्राऐवजी बलेट पेपर द्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी करीत त्याने इव्हीएम फोडले. कवठा-बहादूरा येथे सकाळी मतदानास प्रारंभ झाला. यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण घ्यारे या इसमाने गोंधळ घातला. ईव्हीएम मशिनवर आपला विश्वास नसल्याचे सांगत त्याने बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. घ्यारे याने मतदान यंत्र जमीनीवर आदळले. यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. निवडणुक अधिकाऱ्यांनी दुसरे मतदान यंत्र बोलावल्यानंतर एका तासाने मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. दरम्यान, श्रीकृष्ण घ्यारे याला उरळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी :

बुलडाणा 34.43 %
> अकोला 34.46 %
> अमरावती 33.68 %
> हिंगोली 37.44 %
> नांदेड 38.19 %
> परभणी 37.95%
> बीड 34.65 %
> उस्मानाबाद 34.94 %
> लातूर 36.82 %
> सोलापूर 31.56 %

उस्मानाबाद जिल्ह्यात 3 गावात मतदानावर बहिष्कार

> महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांनी केले मतदान

> अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील योगेश नागळे हा युवक मतदान केल्यानंतरच बोहल्यावर चढण्यासाठी मार्गस्थ झाला

> हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खा. राजीव सातव यांनी आपले संपत्नीक मतदान मसोड ता. कळमनुरी येथे मतदानाचा हक्क बजावला

>माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

> उमरखेडचे आमदार राजेंद्र नाजरधाने यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

> सोलापूर – उजनी धरणातून पाणी सोडले नाही, यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुडल, अंकलगी आणि आळगी या तीन गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. आंदोलन करून बहिष्कार टाकण्याचा दिला होता इशारा.

> भाजप खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी बजावले मतदानाचे कर्तव्य.

> उस्मानाबादेत मतदानावेळी फेसबुक लाईव्ह करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

> अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रविण पोटे पाटील यांनी आपल्या परीवारासकट सकाळीच मतदानाचे कर्तव्य बजावले.

अगोदर मतदान नंतर बोहल्यावर चढणार
जालना- रामसगावतील आकाश भोजने या तरुणाने स्वतःचे लग्न असून देखील लोकशाही बळकट करण्यासाठी अगोदर मतदानाला महत्व दिले. तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

> विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

> मतदान झाले जाहीर, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन मध्ये अचानक बिघाड झाला मशीन दुरुस्त करताना कर्मचाऱ्याकडून चुकीचे बटन दाबले गेले आणि झालेले मतदान फुटले. तेथे राष्ट्रवादीला 22 शिवसेनेला 8 वंचित बहुजन आघाडी ला 2 आणि अपक्षाला एक मत पडल्याचे समोर आले.मतदान सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, मतदान यंत्रामध्ये निर्माण झालेल्या किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे तब्बल २६ ठिकाणी बॅलेट युनीट तर २४ ठिकाणी कंट्रेल युनीट बदलावे लागले. ५६ ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलावे लागण्याची पाळी निवडणूक यंत्रणेवर आली.

बुलडाणा जिल्ह्यातील १९७९ मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोल झाल्यानंतर शांततेत मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी सात ते नऊ या कालावधीत ७.८५ टक्के अर्थात आठ टक्के मतदान झाले होते. नऊ वाजेपर्यंत एकूण एक लाख ३८ हजार १५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची ही सरासरी टक्केवारी २०.२९ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यामुळे प्रामुख्याने या टप्पात जवळपास १२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

दुसरीकडे दुपारी एक वाजेदरम्यान मतदानाच्या दिवशी तिसऱ्या टप्प्यात ३४.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये  सहा लाख पाच हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये दोन लाख ६८ हजार ९४० महिला आणि तीन लाख ३६ हजार ५५८  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुलडाणा जिल्ह्यात १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार आहेत. यामध्ये आठ मतदार हे तृतियपंथीय आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व संबंधीत वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसून मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.