अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत ‘बंद’

0
17

राजुरा,दि.19ः- येथील इन्फंट जिजस इंग्लीश स्कू लच्या वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व संस्थाचालकांसह सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी राजुरा येथे गुरुवारला दुपारी एक वाजता विराट मोर्चा निघाला. पंचायत समिती येथून निघालेल्या या मोच्र्यात महिला व तरुणी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या. हा मोर्चा घोषणा देत नाका क्रमांक तीन, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक मार्गे तहसील कार्यालयाजवळ आला. स्थानिक जि. प. विद्यालयातील पटांगणात जाहीर सभा झाली. या सभेत महिला कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
शहराने पहिल्यांदाच एवढा मोठा मोर्चा अनुभवला. एैतिहासिक असा हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निघाल्यानंतर त्याचे पहिले टोक जुने बस स्थानकाजवळ तर दुसरे टोक नाका क्रमांक तीनवर होते. आज राजुरा शहर पुर्णपणे बंद होते. राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावातील आदिवासी व बाहेर जिल्हय़ातून कार्यकर्ते मोच्र्यात सहभागी झाले.सभा सुरू होताच आयोजन समितीने व्यासपीठावर बोलाविलेल्या सर्व पुरुष नेत्यांच्या उपस्थितीला काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. अखेर आमदार अँड. संजय धोटे, आ. प्रा. राजू तोडसाम, आ.अँड. वामनराव चटप, खुशाल बोंडे, सिध्दार्थ पथाडे, पप्पु देशमुख, संदीप गिर्हे, प्रभु राजगडकर, दथरथ मडावी व अन्य पुरुष नेते उठून गेले. यानंतर पारोमीता गोस्वामी, कविता मडावी, मोनाली पाटील, चित्रलेखा धंदरे,छाया सोनवणे, स्वाती देशपांडे, सुवर्णा वरखेडे, जोत्स्ना मडावी यांची भाषणे झाली.
सर्व महिलांनी या प्रकरणातील आरोपींसह संस्था संचालकांवर कडक व ताबडतोब कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी केली. यावेळी पारोमीता गोस्वामी म्हणाल्या की, आदिवासी समाजावर सतत अन्याय होत असून, आता आदिवासींनीच जागृत होण्याची गरज आहे. या घटनेतील अन्यायग्रस्त महिलांनी आपल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरुध्द पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले. यावेळी आदिवासी महिलांनी उपविभागिय अधिकार्‍यांनी व्यासपीठावर येऊन निवेदन स्विकारण्याची मागणी केली.शेवटी एसडीओ योगेश कुंभेजकर यांनी व्यासपिठावर जाऊन महिलांचे निवेदन स्विकारले. निवेदनात संस्थेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक, अधीक्षक व संबधित कर्मचार्‍यांवर पास्को व अँट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा, इन्फंट कॉन्हेंटची मान्यता रद्द करावी, आरोपींविरुध्द फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा,राजुरा ठाणेदार यांना निलंबित करावे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील अधिकार्‍यांवर कारवाई करावी, यासह अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. धिरज मेश्राम यांनी सभेचे संचालन केले. मोर्च्यात आमदार अँड. संजय धोटे, माजी आमदार अँड. वामनराव चटप, प्रभु राजगडकर, प्रमोद बोरीकर, खुशाल बोंडे, राधेश्याम अडाणिया, बापुराव मडावी, गोदरु पाटील जुमनाके, निळकंठ कोरांगे, वाघु गेडाम, भारत आत्राम, घनश्याम मेर्शाम, महिपाल मडावी यांच्यासह अनेक पक्षाचे नेते सहभागी झाले.
मोर्चाला भाजप, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, शिवसेना, रिपाई, गोंडवाना गणतंत्र पार्टी, ओबीसी महासंघ, बसपा,  राजुरा व्यापारी असोसिएशन,तनिष्का महिला मंच, प्रेमांजली महिला मंडळ, शेतकरी महिला आघाडी, मातोश्री महिला मंडळ,एकता महिला मंच, वसुंधरा महिला मंडळ, यांचेसह अनेक पक्ष व आदिवासी संघटना या मोच्र्यात सहभागी झाल्या. या आदिवासींच्या मोर्चाने संपूर्ण राजुरा एकदा ढवळून निघाले. हा मोर्चा एैतिहासिक झाल्याची चर्चा शहरात होती. राजुर्‍यात व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला.