गडचिरोली,दि.14:- जिल्हयातील पाणी टंचाई, चारा टंचाई व रोजगार हमीचे कामाबाबत तसेच महसूल विभागासह अन्य सर्व विभागांचा विकास कामांचा आढावा महसूल व वन विभागाचे तसेच जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी आज एका बैठकीत घेतला. बैठकीत 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्याचे निर्देश आज त्यांनी सर्व कार्यलय प्रमुखांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित होते.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागांनी बैठकीत माहिती देतांना सांगितले की, माहे सप्टेंबर 2018 चे पाणी टंचाई अहवालाचे आधारे जिल्ह्यात पाणी टंचाई टप्पा 1 व 2 मध्ये टंचाई सदृष्य परिस्थिती नसल्यामुळे निरंक पाणी टंचाई आराखडे सादर करण्यात आले. तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी माहिती देतांना म्हणाले की, जिल्हयात गाई म्हशी, बैल, शेळी, मेंढी यांची संख्या 7 लाख 94 हजार 159 असून उपलब्ध चाऱ्याच्या स्तोत्रानुसार म्हणजेच वनक्षेत्र, बांधावरील, कृषिक्षेत्रात आदी. ठिकाणाहून वर्षभरात गोळा होत असलेला चारा पशुधनासाठी पुरेसा आहे. टंचाई नाही.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी माहिती देतांना म्हणले की, शेतकऱ्यांना खरिप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागानी घेतली आहे.
जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान 1502.38 मिमी इतके आहे. गेल्या खरीप हंगामात केवळ 1355.31 अर्थात 95.93 टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वाधिक 135.10 टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात तर सर्वात कमी 74.78 टक्के पाऊस कोरची तालुका क्षेत्रात झाला.जिल्हयात गेल्या हंगामात 2 लाख 2 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. सर्वाधिक 1 लाख 82 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर धानाची पेरणी होती. कापूस 14 हजार , तूर 5 हजार 535, मका 983 हेक्टर, तीळ 328 हेक्टर आणि सोयाबीन 92 हेक्टर व कापूस 13 हजार 975 हेक्टर अशी एकूण 115 टक्के पेरणी झाली होती.भात पिकावर पाने गुंडाळणारी अळी तसेच तुडतुडे यांचा प्रभाव दिसून आला. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाने 50 टक्के अनुदानावर औषधांचा पुरवठा केला होता.
खरिपाचे नियोजन
जिल्हयात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र 1.5 लाख हेक्टर असले तरी गेल्या हंगामात 1.82 लाख हेक्टरवर (119 टक्के) धान पेरणी झाली हे लक्षात घेऊन येणाऱ्या 2019-20 च्या खरिप हंगामात 2 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले चार सुत्री धान लागवड तंत्रज्ञान तसेच श्री पध्दतीने लागवड याचा अधिक वापर व्हावा यासाठी प्रचार करण्यात येत आहे. या पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन 55 टक्के अधिक मिळते. अशीही माहिती यावेळी पालक सचिवांना अवगत करुन देण्यात आली.या बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषिअधीक्षक अनंत पेाटे, उपसंचालक जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पडघन, समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदि. सर्व कार्यालय प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.