कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार

0
19

बुलडाणा(विशेष प्रतिनिधी)दि.20 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धरणगाव वळणावर नजीक भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनाला चिरडल्याने १३ जण ठार तर दोघे जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज सोमवारी दुपारी घडली. या घटनेत मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे.
एम.एच.४६- एम.क्यू.७९२५ ही गाडी सुमारे १५ प्रवासी घेवून अनुराबाद कडे निघाली होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव वळणावर विरूध्द दिशेने येत असलेल्या एम.एच.४०-बी.जी-९११३ या क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने प्रवासी गाडीस चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, या घटनेत प्रवासी वाहन अक्षरश: चेंदामेंदा झाला.तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर ही गाडी कंटेनरखालून बाहेर काढण्यात आली. यात छगन शिवटकर आणि गोकुळ शिवटकर रा. बुरहाणपूर यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना रूग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे मृतकांच्या संख्या १३ वर पोहोचली. तर वनिता प्रभाकर इंगळे (४०) रा. बहापुरा आणि गोकुळ भालचंद्र बेलोकार (३०) रा. बुरहाणपूर  हे दोघे जखमी झाले आहेत.  या अपघातामुळे तब्बल दीड तासापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मृतांमध्ये १३ जणांचा समावेश!
या भीषण अपघातात छगन राजू शिवटकर (२६), सतीश छगन शिवटकर (०६) रा. नागझरी,  विरेंद्र भालचंद्र बेलोकार (०८), सोनीबाई छगन बेलोकार (२५), मीनाबाई बेलोकार (४०) रा. बुरहाणपूर,  अशोक लहू फिरके (५०), नथ्थुजी वामन चौधरी (४०), सुगदेव किसन बोराडे (३०),  अनिल मुकुंद ढगे (४०), छाया गजानन खडसे (३७) , सुरेखा प्रकाश भारंबे (४०)रा. अनुराबाद  यांच्यासह मृतांमध्ये समावेश असलेल्या आरती आणि रेखा अशा दोन ओळख अद्याप पटली नाही.