बल्लारपूरचा कार्तिकेय गुप्ता जेईई परीक्षेत देशात प्रथम;मुंबईची तुलीप पांडे मुलींमध्ये तिसरी

0
15

नवी दिल्ली, दि.१५ : देशातील नामांकीत  भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)मध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या जेईई परिक्षेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथील कार्तीकेय गुप्ता याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  मुंबईच्या तुलीप पांडे हिने मुलींमधून  तिसरा क्रमांक मिळवला आहे.
जेईई (ॲडव्हान्स) २०१९ परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला.देशभरातून १ लाख ६१ हजार ३१९ उमेदवारांनी ही परिक्षा दिली होती यापैकी ३८ हजार ७०५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.  चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथील कार्तीकेय गुप्ता याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  अहमदाबाद (गुजरात) येथील शबनम सहाय ३७२ पैकी ३०८ गुण मिळवून मुलींमधून प्रथम आली
आहे. पहिल्या पाच मुलींमध्ये मुंबईच्या तुलीप पांडे हीने स्थान मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
जेईई (ॲडव्हान्स) २०१९ परिक्षेमध्ये देशभरातून ३३ हजार ३४९ विद्यार्थी, ५ हजार ३५६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत . यातील खुल्या प्रवर्गातून एकूण १५ हजार ५६६,  खुलावर्ग (इडब्लुएस) मधून ३ हजार ६३६, इतर मागास वर्गीयांमधून ७ हजार ६५१, अनुसूचित जातींमधून ८ हजार ७५८ तर अनुसूचित जमतींमधून ३ हजार ९४ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.