नांदेड दि.10 :- कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नागरीकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येवून शक्य ती सढळ हस्ते मदत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून अतिवृष्टीने थैमान घातले आहे. यामुळे अनेकांना दैनंदिन गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पूरग्रस्त नागरीक शासकीय छावण्यामध्ये आश्रय घेत आहेत. तसेच या भागातील हजारो हेक्टर शेतावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या भागातील नागरीकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व नागरिकांनी पुढे येवून मदत करण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरीकांनी शक्य ती मदत करावे, असे आवाहन श्री. डोंगरे यांनी केली आहे.
गुरुव्दारा बोर्डाची मदत
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केल्यामुळे नांदेड येथील श्री गुरुव्दारा सचखंड बोर्डाने प्रतिसाद देत दोन ट्रक कपडे, कंबल पाठविले आहेत. तसेच औषधी व डॉक्टरांचा समावेश असलेल्या दोन अॅम्ब्युलन्स पाठविण्यात आले आहेत. यासोबतच लंगर चालविण्यासाठी दोन ट्रक साहित्य पाठविण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती पूर्ववत होत नाही तो पर्यंत या जिल्ह्यात लंगर सुरु ठेवण्यात येणार आहे.