गोंदिया, दि.8 : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित करुन तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून संबंधित विभागाने प्रलंबीत तक्रारींचा निपटारा तातडीने करावे, असे निर्देश खासदार सुनिल मेंढे यांनी दिले.
गोंदिया येथील पंचायत समिती सभागृहात 8 मे रोजी खासदार सुनिल मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती संजय टेंभरे, सर्व जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, गटविकास अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यावेळी मंचावर उपस्थित होते.
या जनता दरबारात प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत अभियान, किसान सम्मान निधी योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मुद्रा लोन, जननी सुरक्षा योजना आदी योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
यावेळी विविध प्रकारच्या तक्रारी सादर करण्यात आल्या. यामध्ये घरकुल मंजूर झाला आहे परंतू निधी उपलब्ध झालेला नाही अश्या बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या. घरकुल बाबत ‘ड’ यादी अंतिम झालेली नाही त्यामुळे आपल्याला वेळ लागणार आहे. मनरेगाची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे असे सांगण्यात आले. स्मशानभूमीचा रस्ता खाजगी जागेतून जात आहे, याबाबत चौकशी करुन उपविभागीय कार्यालयामार्फत तक्रारीचा निपटारा करण्यात यावा. बिरसी विमानतळ येथे ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना अजुनपर्यंत भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही अशी तक्रार करण्यात आलेली आहे. मोबाईल टॉवरला ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ग्रामपंचायत ठराव नुसार निर्णय घेण्यात येते असे यावेळी सांगण्यात आले. तक्रारकर्त्यांची संबंधित यंत्रणेने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी.
2005 पासून अतिक्रमणमध्ये घर बांधले असता घर तोडण्यात आले. याबाबत पुनर्वसन पॉलिसी शासन ठरवित असते असे उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी सांगितले.
ग्रामपंचायत सेजगाव येथे पंधराव्या वित्त आयोगामधून कामे झालेली नसून निधीची उचल करण्यात आलेली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी असे निर्देश खासदार सुनिल मेंढे यांनी दिले.
जनता दरबाराच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रलंबीत प्रकरणांचे निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी खासदार सुनिल मेंढे यांनी दिली.
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) लिना फलके, तहसिलदार मानसी पाटील, नायब तहसिलदार सीमा पाटणे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी तक्रारकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.