मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

0
40

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात 626 अर्ज

 नागपूर , दि.20: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी विविध विभागाकडे उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित केल्या. त्यांनी या जनता दरबारात एकूण 626 निवेदने स्वीकारली.

            महिला व बाल विकास विभागाच्या पिंक ई-रिक्षा वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपूरच्या विविध भागातील नागरिकांनी येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील हैदराबाद हाऊस या मुख्यमंत्री सचिवालयात एकच गर्दी केली होती. श्री फडणवीस यांची दिव्यांग, महिला, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या सांगून निवेदन दिले. म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्री यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याबाबत आश्वस्थ केले. दुपारी 12 ते 3 दरम्यान या जनता दरबारात जवळपास 2 हजार नागरीक सहभागी झाले होते तर 626 निवेदन प्राप्त झाली आहेत.

          विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, समाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.