मुंबई, दि. २१ : प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी राज्य असून त्याचा आदर्श देशभरात घेतला जातो, या पार्श्वभूमीवर प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून यशस्वी केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग होईल, त्यादृष्टीने सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२३-२४ तसेच सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला शिवकालीन काळापासून प्रशासकीय कार्यपद्धतीचा उत्कृष्ट वारसा लाभलेला असून येत्या दहा पंधरा वर्षात राज्याला जागतिक स्तरावर अनेकविध संधी उपलब्ध होणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचे मजबूत स्थान निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महत्वपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे, महाराष्ट्राच्या सक्रिय सहभागातून देशाचे ध्येय साध्य होण्यास मोठे सहाय्य मिळते. यासर्वांत प्रशासकीय अधिका-यांचे योगदान, गतिमानता, पारदर्शक लोकाभिमुख कार्यपद्धतीचा स्विकार निश्चितचं महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. महाराष्ट्राला ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, किंबहुना ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे हे ध्येय महाराष्ट्र प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीने मुदतीपूर्वीच साध्य करु शकते. राज्य शासनाने राबवलेल्या शंभर दिवसाच्या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी सर्व विभागांनी केली आहे. या संकल्पनेच्या यशाचे श्रेय हे प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचे असून काम पारदर्शक आणि गतीमानतेने यशस्वी होते याची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे लोकसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे समाधान हे अधिका-यांनाही वेगळा आनंद देऊन जाते. अनेक ठिकाणी जेव्हा लोक वीस तीस वर्षांपूर्वी केलेल्या एखाद्या अधिका-याच्या कामाचा दाखला देतात तेव्हा आपल्या कामातून मिळविलेली ही ओळख मोठी गोष्ट असते. चांगल्या भावनेतून केलेले काम हे यशस्वी होतेच. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात .तंत्रज्ञानाचा व्यापक स्विकार आणि वापर हा गरजेचा आहे.अनेक विभागांच्या चांगल्या कल्पनांचे,निर्णयाचे प्रमाणिकरण व्हायला पाहिजे, जेणेकरुन व्यापक स्तरावर त्या कामांचा लाभ इतरांनाही होईल.
प्रशासनात लोकाभिमुख दृष्टिकोन, पारदर्शक कारभार आणि गतिशील कार्यपद्धती महत्वाची आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अधिका-यांची असते. लोकसेवेचा भाव मनात असेल तर ही जबाबदारी यशस्वी होते. अशा चांगल्या कार्याला पुरस्कार मिळणे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळणे यादृ्ष्टीने पुरस्कार आणि त्यातुन मिळणारे प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी आहे. ही ऊर्जा भविष्यातील कार्यासाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.सर्व पुरस्कारार्थींचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन करुन नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. तर यशदाचे अपर महासंचालक राहुल रंजन महिवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी सुरेश कुमार, के.पी.बक्षी, स्वाधिन क्षत्रीय, अजित कुमार जैन यांच्यासह इतर सनदी अधिकारी, पुरस्कारार्थी उपस्थित होते.
प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान दरवर्षी राबविण्यात येते. या अभियानातंर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.
प्रशासकीय गतिमानता अंतर्गत सन २०२३ – २४ चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :-
मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून येणाऱ्या प्रस्तावात सामान्य प्रशासन विभागास प्रथम क्रमांकाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाने अपर मुख्य सचिव यांना गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक अन्न व नागरी पुरवठा विभाग 6 लाख रु. पारितोषिक, तृतीय क्रमांक मराठी भाषा विभाग ४ लाख रु. देऊन गौरविण्यात आले.
राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणाऱ्या प्रस्तावात प्रथम क्रमांकाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाने विभागीय आयुक्त, नागपूर, द्वितीय क्रमांक – व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ 6 लाख रु. पारितोषिक, तृतीय क्रमांक – विभागीय आयुक्त, अमरावती ४ लाख रु. देऊन गौरविण्यात आले.
विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात प्रथम क्रमांक – अति. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर 10 लाख रु., द्वितीय क्रमांक – जिल्हाधिकारी, वर्धा 6 लाख रु. पारितोषिक, तृतीय क्रमांक – मुख्य अधिकारी, नगर परिषद निलंगा, जि. लातूर ४ लाख रु. देऊन गौरविण्यात आले.
महानगरपालिका गटात प्रथम क्रमांक – आयुक्त, नागपूर महानगपालिका 10 लाख रु., द्वितीय क्रमांक –आयुक्त, पुणे महानगरपालिका 6 लाख रु. पारितोषिक, तृतीय क्रमांक – आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका ४ लाख देऊन गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट कल्पना/ उपक्रम प्रथम क्रमांक – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक – ग्रामपंचायत बोराडी, जिल्हा परिषद, धुळे 30 हजार रुपये, तृतीय क्रमांक – मुख्य अधिकारी, एरंडोल नगरपालिका, जिल्हा जळगाव
सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात प्रथम क्रमांक – योगेश कुंभेजकर, (तत्कालीन) जिल्हाधिकारी, भंडारा 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक – निलेश देशमुख, (तत्कालीन) उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 30 हजार रुपये, तृतीय क्रमांक – रामदास कोकरे, (तत्कालीन) जिल्हा सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन, लातूर 20 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
शासकीय कर्मचारी गटात प्रथम क्रमांक – सहायक शिक्षक, विद्यामंदिर, यादववाडी, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक – पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर, तलाठी, कळंबे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर 30 हजार रुपये, तृतीय क्रमांक – जनार्दन दत्तात्रय बंगाळे, मंडल अधिकारी, खिरोदा, तहसील कार्यालय, यावल, जिल्हा जळगाव 20 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
सन 2024 – 25 चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून येणारे प्रस्तावामध्ये प्रथम क्रमांक, प्रधान सचिव, लेखा व कोषागारे, वित्त विभाग मंत्रालय, मुंबई १० लाख रुपये देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक, वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई यांना ६ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले.
विभागीय स्तरावरील प्रस्तावामध्ये प्रथम क्रमांक, सहसंचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रीय कार्यालय अमरावती यांना १० लाख, रुपये देवून गौरव करण्यात आले. द्वितीय क्रमांक, पोलीस अधिक्षक, वाशिम यांना ६ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांना ४ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले.
महानगरपालिका स्तरावरून येणारे प्रस्ताव या विभागात प्रथम क्रमांक – आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना (१० लाख रुपये ), द्वितीय क्रमांक – आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना (६ लाख रुपये ) तृतीय क्रमांक – आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका यांना ( ४ लाख रुपये) देऊन गौरवण्यात आले.
सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम अंतर्गत शासकीय संस्था विभागात प्रथम क्रमांक,जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम , द्वितीय क्रमांक, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती , तृतीय क्रमांक, मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर यांना मिळाला.
शासकीय अधिकारी या विभागात प्रथम क्रमांक विकास रमेश नवले मुख्य अधिकारी, देवळाली प्रवरा नगर परिषद, जिल्हा अहिल्या नगर, द्वितीय क्रमांक निखिल राजू पाटील नायब तहसिलदार, तहसील कार्यालय, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली , तृतीय क्रमांक जिल्हाधिकारी नागपूर विपिन इटनकर, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर विनायक महामुनी यांना मिळाला.
शासकीय कर्मचारी विभागात प्रथम क्रमांक मोहसीन शेख मंडळ अधिकारी, राहता, जिल्हा अहिल्यानगर, द्वितीय क्रमांक ज्योती नागलवडे शिक्षिका, जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा, तुमसर, जिल्हा भंडारा तृतीय क्रमांक कामराज चौधरी ग्रामीण महसूल अधिकारी, पुसद यांना मिळाला.