पाचवीचा अभ्यासक्रम आता ८०० गुणांचा

0
20

नाशिक – राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार पाचवीच्या अभ्यासक्रमात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून बदल होणार आहे. आता ९०० ऐवजी ८०० गुणांची परीक्षा होईल. परिसर अभ्यासाचे दोन पेपर असतील.
महिला सक्षमीकरण आणि प्रात्यक्षिकांवर अधिक भर राहील. इतिहासाचा ४० गुणांचा स्वतंत्र पेपर असेल. त्यात स्थानिक संस्कृतीचा समावेश राहील.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. २०१३ पासून तीन टप्प्यांमध्ये या अभ्यासक्रमांचा अंतर्भाव केला जात आहे.

इयत्ता पाचवीला पूर्वीच्या अभ्यासक्रमानुसार विज्ञान १०० गुणांचा, तर इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र १०० गुणांचा पेपर होता. आता परिसर अभ्यास एकमध्ये विज्ञान, भूगोल आणि नागरिकशास्र असा ६० गुणांचा पेपर असेल. परिसर अभ्यास दोनमध्ये इतिहासाचा ४० गुणांचा पेपर असेल. कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणात आता लोकसाहित्य, नृत्य, संगीत, स्थानिक संस्कृतीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात लॅटिनऐवजी मराठी शब्दांचाच वापर करण्यात आला आहे.