चंद्रपूर,दि.13ः- जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन होणारी विकासकामे असो वा लोकांची कामे ही थेट लोकांपर्यंत पोचणारी असतात. कर्तव्याची जाण व कायद्याचे ज्ञान हाच लोकप्रतिनिधीच्या यशाचा खरा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर चालत जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रश्नांच्या निराकरणाला प्राधान्य देत लोकहीत साधावे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आज अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार अतुल देशकर, भाजपा नेते राजेंद्र गांधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, नवनिर्वाचित जि.प. उपाध्यक्षा सौ. रेखा कारेकार, महापौर राखी कंचर्लावार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे, हिरामण खोब्रागडे, सौ. रेणुका दुधे, नामदेव डाहूले आदी पदाधिका-यांसह भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थिती होती.यावेळी आ. मुनगंटीवार यांनी सौ. संध्या गुरनुले यांना अध्यक्षपदाच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, प्रलंबित विकासकामे यावर भर देत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात ही जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर ठरावी यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करू असे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सांगितले