‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज दि.१० ते १४ एप्रिल पर्यंत तब्बल पाच दिवस राहणार बंद!

0
71

मुंबई – विविध सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा असलेले ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज तब्बल पाच दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवरून प्रदान केल्या जातात. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल विकसित केले आहे. मात्र दिनांक १० ते १४ एप्रिल असे पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहील असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

‘आपले सरकार’ हे महाराष्ट्र शासनाचे एक वेब पोर्टल आहे, जे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे, नागरिक विविध सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि त्यांची माहिती मिळवू शकतात. नागरिकांना सरकारी सेवा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.

या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतनासाठी पुढचे पाच ते हे पोर्टल बंद करण्यात येणार आहे. या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत.

राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार’ केंद्र चालक, ‘सेतू’ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.