जळगाव:–नदीत बुडालेल्या पाच वर्ष मुलाला वाचवण्यासाठी आई व मावशीने नदीत उडी घेतली. या घटनेत पाच वर्षीय मुलासह आई व मावशीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगावमधील यावल तालुक्यातील अंजाळे गावात ही घटना घडली आहे.वैशाली सतीश भिल (आई), 5 वर्षीय मुलगा नकुल सतीश भिल आणि मावशी सपना गोपाळ सोनवणे (वय 27 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
अंजाळे येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी तिघेही जण आले होते. कार्यक्रमानंतर कपडे धुण्यासाठी गावाजवळच असलेल्या तापी नदीवर ते गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली आणि सपना या नकुलसह तापी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. तिथेच नकुल खेळता-खेळता नदीच्या पाण्यात गेल्या. तोल गेल्यान तो नदीच्या पाण्यात बुडू लागला.
मुलगा नदीत बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी आई व मावशीनेही नदीत उडी घेतली. मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने या घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने तिघांचीही मृतदेह बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.