गडचिरोली : राज्यात सर्वाधिक मलेरियाग्रस्त जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार सर्च फाउंडेशनचे संस्थापक डॅा.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे हे या गटाचे सदस्य सचिव आहेत.
या कार्य गटाची बैठक सर्चमध्ये पार पडली. यावेळी जिल्ह्याकरिता आराखडा तयार करणे आणि तीन वर्षासाठी अंदाजपत्रक प्रस्तावित करणे, हिवताप निर्मूलनाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा योजनेकरिता सल्ला घेणे, अंमलबजावणी प्रगतीचे पुनर्विलोकन करणे, अंतिम मूल्यांकन व अहवालाबद्दल सल्ला देणे यावर चर्चा झाली.
मलेरिया निर्मूलनासाठी अंमलबजावणी समिती स्थापित करण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी अविश्यात पंडा, सदस्य सचिव जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके राहतील, याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके हे सदस्य राहतील.