गोंदिया, दि.17 : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असल्याच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. सदर संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्याबाबत निदर्शनास येत आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2018 मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला 1 वर्ष कारावास तसेच 1 लक्ष रुपये पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतुद नमुद करण्यात आलेली आहे.
आपल्या आसपासच्या परिसरामध्ये बालकांच्या अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 यावर संपर्क साधून बालकांवरील शारिरीक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी केले आहे.