वाशिम, दि. 14 : रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने केलेल्या विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे रस्ते अपघात, रस्ते अपघातातील जखमी व मृत्यूंच्या संख्येते घट झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात वाशिम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचा सन्मान केला.
यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) मधुकर पांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने रस्ते अपघातामधील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवून रस्ते अपघात कमी करण्याचा प्रयत्न केला. सन २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये रस्ते अपघात व रस्ते अपघातातील जखमींच्या संख्येत १६ टक्के, रस्ते अपघातातीलमृत्यूंच्या संख्येत २३ टक्के घट झाली आहे. रस्ते अपघात व रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या कमी करण्यामध्ये वाशिम जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या या कामगिरीबद्दल आज राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समितीचा सन्मान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व सदस्य यांच्यावतीने अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, पोलीस उपाधीक्षक मृदुला लाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी हा सन्मान स्वीकारला.